Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

कारण आम्हाला विसर सहज पडतो... | because we forget easily...

because we forget easily

कारण आम्हाला विसर सहज पडतो. . .

 

 

हे गजानना , हे गणपती बाप्पा !

तू सकल विद्येची देवता !

ह्यावर्षी  आमचं एवढं एक मागणं पूर्ण कर

आम्हाला स्मरणशक्ती चांगली दे

कारण आम्हाला विसर सहज पडतो.

सहज विसर पडतो की आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत.

परस्त्रीचा मान कसा राखावा याचं जगाला उदाहरण दिलं जातं माझ्या राजाचं !

पण आम्हाला विसर सहज पडतो त्यांच्या शिकवणीचा !

आमच्यातले काही नराधम मग लहान कळ्यांना सुध्धा सोडत नाहीत अश्या नीच अवलादीला मग कायद्याचं रक्षण मिळतं. त्याचा "चौरंग" नाही होत कारण आमच्या काही कायद्याच्या रक्षकांना त्यांच्या कर्त्याव्याचा विसर पडतो. ज्यांच्या भरवश्यावर राहावं तेच आपल्या जबाबदारी बद्दल उदासीन राहतात.

दोष त्यांचा नाहीच,  दोष आमच्या स्मरणशक्ती चा आहे म्हणून बाप्पा आम्हाला स्मरणशक्ती चांगली दे. कारण आम्हाला विसर सहज पडतो....

 

चार दिवस आमचे मीडिया वाले प्रकरण तापवून ठेवतात. मग त्यांना दुसरं खाद्य भेटत. मग त्यांना पहिल्या समस्येचा विसर पडतो. पत्रकरिता चुलीत घाला आम्हाला आमचं घर भरायचे ते बघा.

ह्यात पण दोष त्यांचा नाही. त्यांची स्मरणशक्ती कमजोर आहे. म्हणून बाप्पा आम्हाला स्मरणशक्ती चांगली दे. कारण आम्हाला विसर सहज पडतो....

 

नेते येतात , ठो ठो बोंबा मरतात. नराधमाला फाशीच होणार म्हणतात.

समित्या बसतात. चौकश्या होतात.

अहवाल बनतात, शिफारशी होतात,

बदल्या होतात, निलंबन पण होतात.

पण तेवढ्यात निवडणुका येतात. आणि मग नेते विसरून जातात.

अहो पण हा त्यांचा दोष नाहीच आहे. त्यांची स्मरणशक्तीच कमजोर आहे तर ते तरी काय करणार. 

म्हणून बाप्पा आम्हाला स्मरणशक्ती चांगली दे.   कारण आम्हाला विसर सहज पडतो....

 

महाराजांचं नाव घेतलं की काय स्फुरण चढत आम्हाला.

मग आम्ही मावळे शुर . .

आमच्या धमण्यांमध्ये मग लावा वाहू लागतो.

मग आम्ही ठरवतो महाराजांचा मोठा पुतळा उभारायचा.

जगात भारी.

पण आमच आम्ही विसरतो की पुतळा महाराजांचा आहे , की आपल्या तीर्थरूप बापाचा नाही.

विसरतो त्याला मजबुती द्यायला.

महाराजांना आपल्या जीवापाड जपणारे त्यांचे मावळे विसरतो आपण. वेळेला आपले प्राण देऊन त्यांनी महाराजांना जपलं. आणि आपण ......

आपण एक पुतळा सांभाळू शकत नाही.

ह्यात पण आपला दोष नाही. साला ही स्मरणशक्ती च कमजोर आहे. म्हणून बाप्पा आम्हाला स्मरणशक्ती चांगली दे. कारण आम्हाला विसर सहज पडतो....

 

आता बाप्पा तू म्हणशील कि ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. पण तसं नाही बाप्पा. आम्ही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा विसरतो.

 

आई बापाने आमच्यासाठी उपसलेले कष्ट आम्ही विसरतो.

ज्या शाळेने आम्हाला घडवलं ती शाळा विसरतो. 

मित्राची मैत्री विसरतो. गाव विसरतो,  आपली माती विसरतो. ज्यांनी ज्यांनी पडत्या काळात हाथ दिला तो हाथ आम्ही विसरतो.   

बाहेरख्यालीपणाच्या नादात घरची गृहलक्ष्मी विसरतो.

कारण आमची स्मरणशक्ती सोयीनुसार वागते. म्हणून बाप्पा आम्हाला स्मरणशक्ती चांगली दे. कारण आम्हाला विसर सहज पडतो....

 

हा…. पण काही गोष्टी आम्ही कधीच विसरत नाही.

 

पैशाच्या मागे धावणे आम्ही विसरत नाही. राजकारण्यांसाठी भांडणे आम्ही विसरत नाही. जाती भेद तर  आम्ही कधी म्हणजे कधीच विसरत नाही. लोभ, मत्सर, द्वेष हे आम्ही विसरत नाही.

 

आम्ही रस्त्यावर थुंकायला विसरत नाही. चांगल्या कामातून अंग काढायला आम्ही विसरत नाही. 

 

पण  आम्ही काय विसरतो ..

आम्ही नीतिमत्ता विसरतो. आम्ही समाज विसरतो. आम्ही आमचा देश विसरतो. आम्ही माणुसकी विसरतो. 

म्हणून बाप्पा आम्हाला स्मरणशक्ती चांगली दे. कारण आम्हाला विसर सहज पडतो.. . . 

 अव्यक्त अभिजीत 

मित्रानो आमचे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर दिलखुलासपणे शेअर करा. आणि आपले अभिप्राय कळवत राहा 

अजून वाचा :  २६/११ ची काळरात्र

अजून आवडेल असे : वेषांतर

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. अप्रतिम लिखाण मोहिते साहेब, हो तुमचं अगदी बरोबरआहे, आपण आजकाल बऱ्याच गोष्टी विसरतो, बाप्पाने सर्वाना चांगली स्मरणशक्ती देण्याची गरज आहे.

    उत्तर द्याहटवा