प्रसंग क्रमांक १
पावसाळ्यातील एक सकाळ. वेळ सकाळची कामावर जायची. मी गडबडीत घरातून निघालो. बाहेर मुसळधार पाऊस चालू होता. मी छत्री उघडुन रिक्षा स्टँड पर्यंत आलो. समोर आलेली रिक्षा पकडली. रिक्षाचे पावसापासून रक्षण करण्यासाठी लावलेले दरवाजासदृश्य झिरझिरीत पडदे लावून घेतले. छत्री सीटच्या पुढच्या दांड्याला लावली. पावसावर चरफडत स्टेशन कडे प्रयाण करू लागलो. रिक्षावाला सकाळचं " धूम" पिक्चर पाहून आल्यासारखा रिक्षा चालवत होता. बाहेर पाऊस थांबला. निर्धारित वेळेत इच्छित स्थळी पोहचल्यावर मी रिक्षा वाल्याला पैसे दिले आणि ट्रेन पकडायला धूम ठोकली.
प्रसंग क्रमांक २ :
वरील प्रसंग क्रमांक एक नंतर चा आठवडा. शनिवार ची संध्याकाळ. नुकताच पगार झाला होता. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाच्या नियमाप्रमाणे "सामान भरण्यासाठी" सहकुटुंब आम्ही डी मार्ट आलो होतो. सामानाने भरलेली ट्रॉली घेऊन पार्किंग एरियात आलो. पाऊस नव्हता. पिशव्या गाडीला लावत असताना छत्री त्या ट्रॉलीत ठेवली. पिशव्या लावून झाल्यावर आम्ही तिघेजण गाडीवर adjust करत घराकडे निघालो.
प्रसंग क्रमांक ३:
प्रसंग क्रमांक दोन नंतर जेमतेम 8 - 10 दिवस झाले असावेत. घरातून कामावर निघताना ठरल्याप्रमाणे पाऊस सुरू होता. मी ट्रेन पकडुन ठाण्याला पोहचलो. ठाणे स्टेशन वरून बी केबिन पर्यंत पावसातून छत्री घेऊन वाट काढत पोहचलो. शेअर रिक्षा साठी मोठ्ठी रांग लागली होती. शेवटी मी डायरेक्ट रिक्षा करून ऑफिस ला निघालो. रिक्षात बसल्यावर ओली छत्री मधल्या दांड्याला लावली. ऑफिस जवळ पोहचलो तेव्हा पाऊस थांबला होता. 9.30 वाजत आलेले. पटकन रिक्षा वाल्याला पैसे दिले आणि पळालो.
तुम्ही म्हणाल ह्या वरील तिन्ही प्रसंग का तुम्हाला सांगतोय. काही विशेष घडलं नाही त्यात असे तुम्हाला वाटेल. पण वरील तिन्ही प्रसंगात एक गोष्ट विशेष सामाईक होती. कोणती माहितेय?
वरील तिन्ही प्रसंगात मी छत्री गमावून बसलो. हो ! धक्का बसला ना ! पण गेल्यावर्षी महज एक महिन्याच्या अंतरात मी तीन छत्र्या गमावल्या. पहिली बदलापूर ला ऑटोमध्ये, दुसरी डी मार्ट आणि तिसरी ठाण्याला ऑटोत. तस मी दरवर्षी एखादी छत्री हरवतोच पण एकाच महिन्यात 3 छत्र्या हरविण्याचा विक्रम बहुधा माझ्याच नावावर असावा. पहिली हरवली तेव्हा नाईलाजाने दुसरी घेतली. दुसरी हरवली तेव्हा मनावर दगड ठेऊन तिसरी घेतली. पण तिसरी हरवल्यावर मात्र त्या वर्षीच्या आर्थिक अंदाजपत्रकात छत्री साठी मंजूर झालेला निधी निगेटिव्ह मध्ये गेल्याने घरच्या अर्थमंत्र्यांनी चौथी नवीन छत्रीची योजना फेटाळून लावली. शेवटी त्याच्या मागच्या वर्षीची दोन काड्या तुटलेली, कापड झिरझिरीत झालेली छत्री उर्वरित पावसाळ्यासाठी वापरायचे ठरवण्यात आले.
खरंतर छत्री हा सामान्य माणसाच्या खूप जवळचा विषय आहे. छत्रीचा शोध कोणी लावला यात खूप मतभेद आहेत आपण त्यात नको पडूया. पण पावसापासून रक्षण करायला छत्री सारखं दुसरं प्रभावी साधन नाही.
माझ्या लहानपणीच्या छत्रीच्या खूप आठवणी आहेत. त्या काळी गावाला रेनकोटचं फॅड नव्हते. सरसकट सगळी मुले छत्री घेऊन शाळेत यायचे. त्या वेळी मी फॉल्डींगच्या छत्री हा प्रकार फारसा पाहिला नाही. कोपरापर्यंत हाताच्या मापाचा छत्र्या फार प्रसिध्द होत्या. पण नंतर "कमळ छत्री" ने आम्हा मुलांचं कुतूहल जागं झालं. चांगली लांबलचक छत्री , वळणदार मूठ, छत्री उघडली की आतून कमळाच्या फुलाचा आकार दिसायचा. तब्बल तीन चार शाळकरी मुले राहतील एवढं क्षेत्रफळ असायचं त्या छत्रीचं. आणि ती छत्री ज्याच्याकडे असेल त्याला जरा जास्त मान असायचा मित्रांमध्ये.
शाळेत छत्र्या हरवण्याचा किंवा बदली व्हायचा प्रकार खूप व्हायचा. त्यावर उपाय म्हणून आमच्या शाळेत चित्रकलेचे "कुंभारसर" मुलांना छत्रीवर नाव टाकून द्यायचे. पाण्याने न मिटणारा रंग वापरून अतिशय सुंदर अक्षरात मुलांची नावे टाकली जायची. नावापुढे मोरपीस, फुलं किंवा दुसरी एखादी नक्षी काढली जायची. त्यामुळे छत्री बदली व्हायचा प्रकार कमी झाला. ट्रक ची रेस लावल्यासारख्या आम्ही छत्र्यांची रेस लावायचो. शाळेत येत जाता पाऊस आला की भले पायातल्या paragon च्या स्लीपर (पांढरी स्लीपर निळा पट्टा ) ने पँट च मातेर झालं तरी डोक्यावर छत्री ऐटीत मिरवत, एकमेकाला छत्री गोल फिरवत भिजवत चालायची मज्जा काही औरच!
माझा शाळेतला एक किस्सा फार मजेदार आहे. आमच्या शाळेत पावसाळी क्रिडास्पर्धा असतं. चिखलाने रपरपित झालेल्या पटांगणात कबड्डी, खोखो, लंगडी सारखे वेगवेगळे खेळ व्हायचे. पावसाळी स्पर्धा म्हटल्यावर पावसातच व्हायच्या. खेळाडू, पंच सर्व पावसात भिजायचे. पण प्रेक्षक मुले आणि गुणलेखक छत्री उघडुन बसायचे. एकदा एक सामना चालू असताना गुणलेखक सर बसले होते त्यांच्या पाठीमागे मी मित्रांसोबत उभा होतो. पाऊस नव्हता. कबड्डी चा सामना रंगात आला होता. अचानक आकाशात ढग आले पाऊस सुरू झाला. खेळ चालूच राहिला पण गुणलेखक सर गोंधळले. त्याच्याकडे छत्री नव्हती. त्यांनी मागे वळून पाहायचा अवकाश मी तत्परतेने छत्री उघडुन त्यांच्या डोक्यावर धरली. बाकी मित्रांसमोर माझी कॉलर टाइट झाली. पण तो पाऊस अल्पायुषी ठरला. दोनच मिनटात पाऊस गेला आणि लख्ख ऊन पडलं.
पण सरांच्या डोक्यावर धरली असल्यामुळे मी छत्री बंद केली नाही. ऊन चांगलच तापलं. थोड्या वेळाने सामना संपला. सर जागेवरून उठले. मला शाबासकी दिली आणि शाळेकडे निघाले. मी मित्रांकडे एक कुत्सित कटाक्ष टाकला आणि छत्री बंद केली...
दुसऱ्याच क्षणी छत्री चे कापड शेंड्या पासून फाटून मुठी पर्यंत आले. तारा सताड उघड्या पडल्या. प्रयोग शाळेतल्या हाडाच्या सांगड्या प्रमाणे तिचा सांगाडाच राहिला. मित्र फिदीफिदी हसू लागले. मला तर काय घडलय याची कल्पनाच नव्हती. खर तर उन्हाने छत्रीचे भिजलेले कापड ताणले गेले आणि धाग्यांची साथ सोडून फाटले. पण मला त्या फाटलेल्या छत्रीत मी स्वतः फाटलेला दिसत होतो कारण घरी गेल्यावर माझी धीर गंभीर आई मला तशीच फाटे पर्यंत मारणार होती.
असो, ह्या छत्रीत पण दोन प्रमुख प्रकार आहेत. लेडीज and जेंट्स. स्त्रियांनी रंगबिरंगी छत्र्या वापराव्या आणि पुरुषांनी काळ्या रंगाच्या हे शास्त्र कोणी सांगितलंय कोणास ठावूक ! चुकून एखाद्या पुरुषाने रंगबिरंगी, फुलावाली, नक्षिवाली छत्री घेऊन रस्त्याने चाललं तर लोक हेटाळणी च्या स्वरूपात हसताना दिसतील. बरं यावर क्रांतिकारी पाऊल उचलायचे सुध्धा धाडस कोण्या पुरुषात नाही ( माझ्या ही नाही). काळा रंग हे कोणत्या पुरुषार्थाचे प्रतीक म्हणून पुरुषांना छत्री रुपात समर्पित केले आहे कुणास ठावूक.
मुंबईत लोकल ट्रेन ने प्रवास करताना सुद्धा तुम्ही छत्रीच वापरणे सोयीस्कर. कारण पावसातून भिजलेला रेनकोट घालून जर तुम्ही खचाखच भरलेल्या डब्ब्यात चढलात तर सह प्रवासी एलियन पाहिल्यासारखे तुमच्या कडे पाहतात. (खरतर काही बुटके लोक रेनकोट घातला की कोई मिल गया मधल्या "जादू" सारखेच दिसतात. ) आणि तुमच्या भिजलेल्या रेनकोट ने जर बाजूच्यांचे कपडे भिजले तर तुमच्या सात कुळांचा उध्दार ठरलेला आहे. म्हणून लोकल प्रवासात छत्रीच उत्तम !
छत्री विसरणे हा स्वभावगुण पावसात येणाऱ्या सर्दीतापाएवढाच स्वाभाविक आहे. दहा मधली सहा लोक तरी बाहेर पाऊस नसेल तर छत्री हमखास विसरतात. माझा एक मित्र पावसाळ्यात नेहमी बदलापूरला सगळ्यात शेवटी डब्यातून उतरतो. कारण माझ्या सारखे काही अफाट दातृत्व असलेले लोक छत्री दान म्हणून ट्रेन मध्येच विसरून जातात. गेल्या वर्षी त्याला तब्बल पाच छत्र्या मिळाल्या होत्या.
आता च्या छत्र्या खूप विकसित झाल्या आहेत. बॅगेत मावेल एवढी छोटी 3 फोल्ड ची छत्री पण येते आता. वर्षभर वापरल्या तरी त्यांची अवस्था चांगली राहते. नाहीतर पहिल्या ज्या छत्र्या यायच्या त्याच्या आत ग्रीस टाकलेलं असायचं. दोन महिन्यात छत्री बंद चालू करून करून आतलं ग्रीस बाहेर यायचं आणि चांगल्या चांगल्या शर्ट चा धुव्वा उडवून टाकायचं. आता लवकरच येणाऱ्या काळात ब्लूटूथ, वायफाय , स्पीकर, 50 मेगापिक्सल कॅमेरा या सर्व सोयींनी परिपूर्ण छत्री आली तर नवल वाटून घेऊ नका. आजकाल ती लांब दांड्या ची छत्री परत फॅशन मध्ये आली आहे. माझा एक मित्र गेल्यावर्षी तशी छत्री घेऊन यायचा. ती छत्री पाहिली की मला "बाहुबली" ची तलवार आठवायची. ती बंद करून हातात धरून चालताना तो मागच्या पुढच्या एक दोघांना हमखास टोचायचा.
पण छत्रीचा खरा उपयोग केला जातो तो सिनेमात. जुन्या हिंदी चित्रपटात छत्रीच्या आत लपवलेल्या गुप्तीने जुने खलनायक खून करत असतं. साऊथ च्या चित्रपटात कोणत्या तरी महाभयानक खलनायकाची एन्ट्री होते तेव्हा त्याचे हुजुरे छत्री उघडुन तयार असतात, तर हिंदी, इंग्लिश सर्व चित्रपटात एकाध पात्र मेलं की त्यांच्या अंत्यविधी ला नेमका पाऊस पडतो आणि मग अंत्यविधीला आलेली गर्दी छत्र्या धरून उभ्या राहतात. " प्यार हुआ इकरार हुआ" ह्या अजरामर गाण्यात राज कपूर आणि नर्गिस सोबत जर ती छत्री नसती तर हे गीत एवढं गाजलं असतं असं मला नाही वाटतं. Kingsman ह्या हॉलिवूड सिनेमातील डोळ्याचं पारणं फेडणारा छत्री चा ॲक्शन सीन लाजवाबच आहे.
पण छत्रीचा अतिशय समर्पक उपयोग काय असेल हे विचारायचे असेल तर नरिमन पॉईंट किंवा दादर चौपाटी किंवा बॅण्डस्टॅण्ड ला गेलेल्या प्रेमीयुगुलांना विचारा. ह्या उपर वेगळं काही सांगायला नको.
सध्या "छत्रिनामा" मध्ये एवढंच! अजून सुचलं तर "छत्रिनामा २" घेऊन येईन. तो पर्यंत तुम्हाला हा "छत्रीनामा" कसा वाटला ते कमेंट मध्ये कळवा. तुमचे अभिप्राय तुम्ही abhijeetatf@gmail.com वर सुध्धा ईमेल द्वारे कळवू शकता. पावसाच्या खुप खुप शुभेच्छा!
3 टिप्पण्या
Mastt ❤
उत्तर द्याहटवाधन्यवाद साई
हटवाअतिउत्तम
उत्तर द्याहटवादरवर्षी एक तरी छत्री हरवण्याचा माझा नियम गेली अनेक वर्ष मी अविरत पाळतोय त्या मुळे तर आणखीन relate करता येतंय ❤️❤️❤️