Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

शहिद भगत सिंग - लहान मुलांसाठी मराठी भाषण | Shahid Bhagat Singh | Speech for kids

 


" शहीद भगत सिंग " 


मित्रानो १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. १५० वर्षाच्या गुलामगिरी च्या जोखडातून भारताला स्वातंत्र्याचा सोनेरी सूर्य पाहायला मिळाला. पण ह्या स्वातंत्र्यामागे होते शेकडो क्रांतिकारकांचे सांडलेले रक्त ! ह्या रक्ताने शिंपलेल्या जमिनीतून स्वातंत्र्याचा मळा फुलला.

देशासाठी शहीद होणाऱ्या शेकडो क्रांतिकारांमधला एक तेजस्वी तारा म्हणजे भगत सिंग.

 

वय वर्ष अवघे २३ , ऐन तारुण्यात ज्यांनी देशासाठी फासावर जाणे स्वीकारले. म्हणजे त्यांच्या अंगी किती जाज्वल्य देशप्रेम भरले असेल ह्याचा विचार करा. आजकालचे २३ वर्षाचे तरुण नीट स्वावलंबी पण होऊ शकत नाहीत त्या वयात भगत सिंग भारतभूमी साठी फासावर गेले.

 

भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ साली तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंगा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किशन सिंह तर आईचे नाव विद्यावती असे होते. तो काळ भारावलेला होता. इंग्रजांविरुद्ध सगळीकडे असंतोष खदखदत होता. भगत सिंग यांचे वडील आणि काका पहिल्यापासून स्वातंत्र्यलढ्यात उतरले होते. साहजिकच देशप्रेम भगत सिंह यांच्या धमण्यांमधून वाहत होते. त्यांचे शिक्षण पण झाले असहकार चळवळीतून सुरू झालेल्या दयानंद अँग्लो वेदिक शाळेत आणि लाहोरच्या नॅशनल कॉलेज मध्ये. भगत सिंग यांचे व्यक्तिमत्त्व, शरीरयष्टी आणि भरदार आवाज यांमुळे त्यांचा इतरांवर चटकन प्रभाव पडत असे.

 

लहानपणापासूनच वाचन हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता. वाचन आणि अभ्यास यांचा त्यांच्या मनाने जणू ध्यास घेतला होता. हया अभ्यासमुळेच त्यांच्या मनातील क्रांतिज्योतीला अजून तेजाने तळपण्याचे कार्य केले. हा अभ्यास भारतातली शतकानुशतकांची व्यवस्था बदलण्यासाठी होता. याच अभ्यासातून त्यांना जगभराच्या क्रांतिकारकांची तत्वे समजली.

 

भगत सिंह यांच्यावर पहिल्यांदा महात्मा गांधीच्या विचारांचा प्रभाव होता. पण असहकार चळवळी दरम्यान चौरीचौरा इथे आंदोलकांनी पोलीस चौकी पेटवली त्यामुळे गांधीजींनी असहकार चळवळ थांबवली. हे भगत सिंह यांना पटले नाही. भारताला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करायला हवा असे त्यांना वाटलेत्यातून आपल्या सहकारी मित्रांना घेऊन त्यांनी क्रांतिकारी कारवाई चालू केल्या. त्या संघटनेचे संघटक होते चंद्रशेखर आझाद.

 

लाल लजपतराय यांच्या एका आंदोलनावर ब्रिटिश सरकारने लाठीचार्ज केला. त्यात लाल लजपतराय यांचा मृत्यू झाला आणि सर्व क्रांतीकाऱ्यांचे माथे भडकले. त्या लाठी चार्ज साठी जबाबदार जेम्स स्कॉट या अधिकाऱ्याला मारण्याचा भगत सिंह यांनी निर्धार केला. सोबत सुखदेव आणि राजगुरू ह्या क्रांतीकारकांना घेऊन त्यांनी जेम्स स्कॉट समजून जॉन साँडर्स गोळ्या घातल्या.

 

त्यानंतर  भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्ली ला कायदेमंडळाच्या अधिवेशनात बॉम्ब फोडले. कोणालाही इजा करता दोघांनी क्रांतिकारकांची पत्रके कायदेमंडळाच्या सभेत टाकली. आणि तिथे पळून जाता "इंकलाब जिंदाबाद" च्या  घोषणा देत स्वतःला अटक करून घेतली.

 

ब्रिटिश तुरुंगात भारतीय कैद्याना फार वाईट वागणूक दिली जात असे. जगभराच्या क्रांतिकारकांचे विचार वाचणाऱ्या भगतसिंग यांना कैद्यांच्या अधिकारांची जाण होती. सर्व कैद्यांना समान सुविधा मिळाव्या म्हणून त्यांनी तुरुंगात आमरण उपोषण चालू केले. ब्रिटिशांनी हे उपोषण तोडायचा हर तऱ्हेने प्रयत्न केले. पाण्याच्या माठात पाण्याऐवजी दूध भरून ठेवले. क्रांतिकारकांना पाण्याचा थेंब पण दिला नाही. पण भगतसिंग आणि त्यांच्या मित्रांनी  हार मानली नाही. ब्रिटिश सरकारच्या विरोधात रोषाचा ज्वालामुखी उफाळला.

 

भगतसिंग यांचे काही विचार:

- "मला फाशी दिली गेली नाही, तर तो मोठाच अनर्थ ठरेल. मी जर हसत हसत मृत्यू स्वीकारला तर भारतातल्या अनेक मातांना आपल्या मुलांनी भगत सिंगांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करावी असं वाटायला लागेल. त्यातूनच स्वातंत्र्यसैनिकांची संख्या वाढेल. ती इतकी वाढेल की, त्यापुढे पाशवी शक्तींना क्रांतीचा मार्ग रोखणं अशक्य होऊन जाईल.’’

 

- ‘गरीब जर गरीबच राहणार असतील तर त्या स्वातंत्र्याला काय किंमत आहे? त्यातून मग गरीब आणि श्रीमंतांमधील दरी नष्ट कशी होणार?’ असं भगत सिंगांना वाटत असे.

 

- माँ, आपला देश स्वतंत्र होईल याबाबत मला कुठलीच शंका नाही. पण मला भीती वाटते की, गोरा साहेब जाईल आणि सत्तेच्या खुर्चीत सावळा साहेब बसेल!’’

 

भगत सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर साँडर्स हत्येचा खटला चालला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशीच्या अगोदर त्यांना वॉर्डन ने विचारले.

"तुमची शेवटची इच्छा काय आहे ?"

भगत सिंग यांनी काही पुस्तके वाचायला मागितली.

‘‘तुमची आणखी काही इच्छा आहे का?’’ असं विचारलं, तेव्हा, ‘‘मला याच देशात पुन्हा जन्म घ्यायचाय; म्हणजे मला माझ्या देशाची सेवा पुन्हा करता येईल,’’ असं भगत सिंग म्हणाले. किती ओतप्रोत भरलेलं होत देशप्रेम त्यांच्या मनात.

२३ मार्च १९३१ रोजी भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यासाठी नेण्यात येत होते. तिघेही जेव्हा फाशीच्या ठिकाणी चालत निघाले तेव्हा त्यांची मान ताठ होती, डोळ्यात देशासाठी बलिदान देत असल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. कुठेही मरणाच्या भीतीचा लवलेश नव्हता. तिघे ही आपली आवडती कविता गुणगुणत होते.

कभी वह दिन भी आयेगा के

जब आझाद हम होंगे

ये अपना आसमान होगा

शहिदोंकी चिताओंपर लगेंगे हर बार मेले

वतन पर मरने वालों का

यहीं नाम--निशान होगा.

तुरुंगातील बाकी कैद्यांनी घोषणा दिल्या. ‘‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है.’’ पाठोपाठ ‘‘इन्किलाब झिंदाबाद’’ आणिहिंदुस्थान आझाद होच्या घोषणा तुरुंगाच्या कॉरिडॉरमध्ये घुमत होत्या.

अखेर भगतसिंग , सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. देशासाठी हसतमुखाने सामोरे जाणारे असे हुतात्मे जगाच्या इतिहासात खचितच मिळतील.

 

अश्या ह्या थोर क्रांतीकारक शहीद भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माझे कोटी कोटी प्रणाम!


अजून वाचण्यासारखे :- छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या