Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

अठरावं वरीस - 18th Years of RCB

 


"अठरावं वरीस "

अठरा आकडा खूप मोलाचा आहे. आपल्याकडे अठरा वर्षाचा झाला की माणूस सज्ञान झाला अस समजतात. त्याला मतदानाचा , ड्रायव्हिंग लायसन्सचा अधिकार प्राप्त होतो. अठरा वर्षाचा झाला की मुलगा " अठरा वर्षाचा घोडा झाला " हे पालुपद ऐकण्यास सिद्ध होतो. तर एवढा ह्या अठरा वर्षाचा महिमा आहे. असाच अठराव्या वर्षात काल काहीतरी नवीन घडलं. आरसीबी आयपीएल जिंकली. दीड तप लागले एक अशी घटना घडायला जी घडावी म्हणून दरवर्षी आरसीबी फॅन्स डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असत. 


अठरावं वरीस लागलं तेव्हा RCB ला मिळाला अधिकार. 

अधिकार विजेता म्हणून मिरवायचा! चकाकणारी ट्रॉफी उचलण्याचा! विराट सारख्या खेळाडूला अठरा वर्ष ट्रॉफी पासून वंचित राहायला लागल यातच ह्या ट्रॉफीच महत्व लक्षात येईल. क्रिकेट हा जंटलमन्स गेम असला तरी क्रूर आहे. द्रविड, कुंबळे, विराट, डिव्हि्लीअर्स, गेल, राहुल, स्टार्क, वॉटसन असे रथी महारथी खेळाडू असताना ज्या ट्रॉफी ला हाथ लावू शकले नाहीत त्या ट्रॉफी ला रजत पाटीदार, जितेश शर्मा, यश दयाल अश्या नवख्या खेळाडूंनी गवसणी घातली. 


मी मुंबई इंडियन्स चा चाहता आहे. आपल्या सचिन मुळे पहिल्यापासून मुंबई इंडियन्स आवडत आली आहे. पण विराट ला ह्या ट्रॉफी ची खरंच गरज होती. त्याच्या डोक्यावरच्या मुकुटात हाच एक रत्न कमी होता जो अठराव्या वर्षी जडलाय. खरं तर खुप अगोदर लागायला हवा होता पण टीम मॅनेजमेंट असो, ऐनवेळी कच खायची सवय असो, एस बी आय चा शाप असो, दुर्दैव असो, ह्या ना त्या कारणाने तो मणी मिसिंग होता तो आता जडलाय. त्यामुळे " किंग कोहली" मुकुट दिमाखाने तेजाने झळकणार ह्यात शंका नाही. म्हणूनच विराट साठी मला आनंद वाटला. ह्या वर्षी तर लागोपाठ ३ ट्रॉफी त्याला मिळाल्या आहेत. टी २० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आता IPL ट्रॉफी. सामना संपायला ३ चेंडू शिल्लक होते. त्यावेळीच त्याच्या डोळ्यात आलेल्या आसवांची किंमत फक्त विराटच जाणतो. 



दुसरा सुखद क्षण आरसीबी फॅन्स साठी. जाम कट्टर आहेत हे फॅन्स, गेली सतरा वर्ष  हारसिबी, लॉलीपॉप असे ट्रोल, अपमान, दुःखच त्याच्या वाट्याला आलं. आजकाल एक दोन नवसानी देव नाही पावला तर लोक देव बदलतात. पण ह्या जमान्यात पण सतरा वर्ष कठोर वनवास भोगून सुद्धा आरसीबी फॅन्स कट्टर राहिले. त्यामुळे त्यांना कडक सॅल्यूट!


बाकी राहिली मॅच ची गोष्ट तर श्रेयश आउट नसता झाला तर, शशांक ने एक बॉल मिस नसता केला तर, स्टोयनीस ने घाई नसती केली तर, ह्या सर्व जर तर च्या गोष्टी आहेत. बिचारी प्रिती झिंटा तिच्या गालावरच्या खळीत दुःख लपवून सदाबहार हसत होती. 


रजत पाटीदार ने चांगली लीडरशिप दाखवली. मोक्याच्या क्षणी त्याने केलेले बॉलिंग चेंजेस त्याच्या तल्लख बुद्धीची झलक दाखवणारे होते. शेफर्डला बॉलिंग ला आणायचा त्याचा डाव पूर्ण गेम फिरवून गेला. दुर्दैव असेल की त्याला ह्या जेतेपदाचे श्रेय पाहिजे तसे दिले जाणार नाही पण त्याचा आणि जितेश शर्मा चा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. 


अठराव्या वर्षी भारतात तरुणांना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो तसंच अठराव्या वर्षी आरसीबी ला "आमच्याकडे पण कप आहे" बोलायचा अधिकार प्राप्त झाला आहे. मुंबई आणि चेन्नई कडे ५-५ आहेत हा वेगळा विषय आहे.  जाता जाता साई सुदर्शन ने ४० ५० लाख रुपये जिंकले ते बघून आनंद झाला. ड्रीम इलेव्हन मध्ये  ह्या वर्षी पण मी करोडपती नाही झालो याचं दुःख आहे.


अजून वाचा : ड्रीम इलेव्हन - स्वप्न करोडपती व्हायचं !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या